पंचाळा येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
शारदा ताई पाटील यांचे अभिवादन, जिजाऊंच्या विचारांनुसार राज्यकारभाराची गरज — प्रतिपादन
बुलढाणा | प्रतिनिधी
जळगावजामोद तालुक्यातील पंचाळा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना जिल्हा महिला प्रमुख शारदा ताई पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास पंचाळा व परिसरातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. उपस्थितांनी “राजमाता जिजाऊ अमर रहें” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
यावेळी बोलताना शारदा ताई पाटील म्हणाल्या की, “आजच्या काळात खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची अत्यंत गरज आहे. स्वराज्य, न्याय, समता, स्त्री-सन्मान आणि लोककल्याण यांचा पाया असलेला राज्यकारभार आज पुन्हा उभा राहणे आवश्यक आहे. राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांच्या रूपाने देशाला आदर्श नेतृत्व दिले, त्याच मूल्यांवर आजचे राज्यकर्ते चालले पाहिजेत.”
त्या पुढे म्हणाल्या की, जिजाऊंचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून ते आजच्या सामाजिक, राजकीय आणि नैतिक अधःपतनावर उपाय आहेत. विशेषतः महिलांनी जिजाऊंच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाज परिवर्तनासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थ, महिला बचत गटाच्या सदस्य, शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.



