राज्यात काँग्रेस संघटनेत मोठे बदल लवकरच; 36 जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांवर गंडांतर….
निवडणुकीतील पराभवाची पार्श्वभूमी — दीर्घकाळ पदावर असलेल्या जिल्हाध्यक्षांमध्ये फेरबदलाचे संकेत
बुलढाणा
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
नगरपालिका, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या पराभवाचा गांभीर्याने विचार करून संघटनेला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. अनेक जिल्हाध्यक्षांचा कार्यकाळ पाच ते दहा वर्षांपेक्षा अधिक काळाचा झाल्याने संघटनात्मक कार्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचे पक्षश्रेष्ठींनी मान्य केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर संघटन बळकट करणे, कार्यकर्त्यांना नव्या जबाबदाऱ्या देणे आणि आगामी निवडणुकांसाठी तयारी मजबूत करणे या उद्देशाने बदलांची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या संभाव्य फेरबदलामुळे जिल्हा पातळीवरील राजकीय समीकरणांमध्ये चांगलीच हालचाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



