-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

रविकांत तुपकर यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 90 हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग मोकळा

रविकांत तुपकर यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 90 हजार अतिवृष्टीग्रस्त
शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग मोकळा
74.45 कोटींची मिळणार मदत; शासनाकडे वारंवार केली होती मागणी
बुलढाणा प्रतिनिधी
अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान भरपाई ची मदत मिळावी, शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळावा, कर्जमाफी मिळावी या महत्वपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर सातत्याने शासनाच्या विरोधात लढा देत आले आहेत. त्यांच्या पाठपुराव्या मुळेच आता जिल्ह्यातील 90 हजार 383 अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना 74.45 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. या संदर्भातील परिपत्रक महाराष्ट्र शासनाने 6 ऑगस्ट रोजी जारी केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मदत म्हणजे रविकांत तुपकर यांनी व शेतकऱ्यांनी सातत्यपूर्ण केलेल्या मागणीचा आणि पाठपुराव्याचा परिणाम आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या संकटांनी ग्रासले आहेत. 25 व 26 जून रोजी जिल्ह्यात ढगफुटीसदृश प्रचंड पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जमिनी खरडून गेल्या होत्या, पिके उध्वस्त झाली होती तर फळबागांचे देखील अतोनात नुकसान झाले होते. दरम्यान रविकांत तुपकर यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला होता आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी असे आश्वासन देखील शेतकऱ्यांना दिले होते. त्यानुसार रविकांत तुपकर यांनी प्रथमतः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले व त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील निवेदन पाठवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी मुंबई गाठून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. व त्यांनी सरकारला मदत देण्याचे निर्देशही दिले होते.त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील 87 हजार 390 हेक्टर जमिनीचे नुकसान होऊन 90 हजार 383 शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला होता, या शेतकऱ्यांना विनाअट तातडीने नुकसान भरपाई मंजूर करावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी रविकांत तुपकर यांनी लावून धरली होती. दरम्यान आता शासनाने 6 ऑगस्ट रोजी एका परिपत्रकाद्वारे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 90 हजार 383 अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना 74.45 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मागणी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित असल्याचे शेतकरी बोलत आहेत. यापूर्वी देखील जीव घेणे आंदोलने करून रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना वारंवार मोठी मदत मिळवून दिली आहे.हा शेतकऱ्यांचा एकजुटीचा परिणाम आहे असं तुपकर सात्यत्याने सांगतात..शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर हे नेहमी रस्त्यावर उतरून लढतात हे शेतकऱ्यांना नव्याने सांगण्याची गरज नाही.

Related Articles

ताज्या बातम्या