अब्रूवर वार, पण धैर्यावर नाही — चिखला घटनेचा तीव्र निषेध; महिलांवरील हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी
बुलढाणा
लोणार तालुक्यातील चिखला येथे २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र ठाम उभा असल्याचे सांगितले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी या प्रकरणी प्रशासनाने निष्पक्ष व तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे.
माहितीनुसार चिखला येथे शिवस्मारक हटविण्याच्या वादातून काही व्यक्तींनी माता-भगिनींवर दगडफेक व मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांच्यासह अनेक महिलांवर अमानुष अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
आपल्या प्रतिक्रियेत ठाकरे यांनी म्हटले की, “महिलांवर हात उगारणे हा केवळ कायद्याचा भंग नसून मानवतेवरचा घाव आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रीसन्मान, न्याय आणि स्वाभिमानाची शिकवण दिली, त्यांच्या विचारांचा अवमान करणारी ही कृती महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही.”
या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत त्यांनी दोषींना शिक्षा व्हावी आणि महिलांना न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.



