राजपूत करनीसेनेकडून भुसावळमध्ये शिवजयंती उत्साहात — छत्रपतींच्या विचारांचा जागर
भुसावळ :
स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना तर्फे शहरात उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात “घराघरात शिवाजी राजे घडवा” हा संदेश देत तरुण पिढीने छत्रपतींच्या आदर्शांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सारिका राजपूत यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक आईने आपल्या मुलांना शिवबा सारखे संस्कार द्यावेत, असे सांगत छत्रपतींच्या चरित्रातून प्रेरणा घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यानंतर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महाराजांना वंदन करत अभिवादन केले. कार्यक्रमास युवक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, समाजसेवक तसेच विविध कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांमध्ये जिल्हा युवक अध्यक्ष संदीप राणा, महिला अध्यक्षा सारिकाताई पाटील, जिल्हा सचिव मीनाताई राजपूत, जेष्ठ समाजसेवक दिलीपसिंग पाटील यांच्यासह अनेक समाजबांधवांचा सहभाग होता.
या कार्यक्रमामुळे शहरात शिवजयंतीचा उत्साहपूर्ण माहोल निर्माण झाला असून छत्रपतींच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.



