बुलढाणा
*नगरपालिकेच्या निवडणुका शांततेत, .पोलीस विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका;…*
*बुलढाणा जिल्ह्यात कडक बंदोबस्त…*
बुलढाणा जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडल्या. या निवडणूक प्रक्रियेत पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली असून जिल्हाभर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
निवडणूक काळात संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष देण्यात आले. मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त, गस्त पथके, दंगल नियंत्रण पथके तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून सातत्याने निगराणी ठेवण्यात आली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली निवडणूकपूर्व नियोजन करण्यात आले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन, वेळोवेळी सूचना, तसेच तात्काळ कारवाईची तयारी यामुळे संभाव्य अडचणींवर वेळीच नियंत्रण ठेवता आले. वरिष्ठ अधिकाऱ्यां समवेत स्वतः जिखा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मैदानात उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवले.
पोलीस प्रशासनाच्या या सतर्कतेमुळे मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि नागरिकांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावला. शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



