बारामती ब्रेकिंग
*मुंबई-बारामती अवघ्या २५ मिनिटांत प्रवास, पण…; ‘ते’ विशेष विमान कसं कोसळलं? प्रश्न उपस्थित केले जात आहेत?..*
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात विमानातील सर्व जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. मुंबईहून अवघ्या 20 ते 25 मिनिटांत बारामती गाठणाऱ्या या अत्याधुनिक विमानाचा अपघात कसा झाला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत….
*बिझनेस क्लास’चा राजा मानलं जाणारं विमान होत ….*
अपघातग्रस्त विमान हे ‘व्हीएसआर’ (VSR) ऑपरेटरचं ‘लिअरजेट 45’ श्रेणीतील असून, त्याचा नोंदणी क्रमांक VT-SSK असल्याची माहिती आहे. हे विमान प्रामुख्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी वापरलं जातं. यात साधारण 8 ते 9 प्रवासी बसू शकतात आणि याची ‘क्लब सीटिंग’ पद्धती विमानात कामकाज किंवा बैठकांसाठी अतिशय सोयीस्कर मानली जाते.
*अत्याधुनिक असूनही अपघात कसा घडला? …*
हे विमान जमिनीपासून सुमारे 51 हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतं, जी उंची अनेक व्यावसायिक विमाने गाठू शकत नाहीत. विशेष म्हणजे, हे विमान छोट्या धावपट्ट्यांवरही सुरक्षित लँडिंग करू शकतं, त्यामुळे बारामतीसारख्या लहान विमानतळांसाठी याला प्राधान्य दिलं जातं. अशा क्षमतांचा विमान असूनही लँडिंगवेळी अपघात घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
दरम्यान, अपघातस्थळी बचावकार्य पूर्ण करण्यात आलं असून तांत्रिक बिघाड, हवामान स्थिती किंवा मानवी चूक यापैकी नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.



