*बुलढाणा ब्रेकिंग*
*कर्जमाफी यादीत तफावत; CIBIL खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांचा शेलसुर स्टेट बँकेवर घेराव*
*’कर्जमाफी की OTS?’ भविष्यातील कर्जासाठी शासनाने जबाबदारी घ्यावी; क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा इशारा*
राज्य शासनाच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठी तफावत असल्याचा आरोप करत चिखली तालुक्यातील शेलसुर येथील स्टेट बँक शाखेला शेतकऱ्यांनी घेराव घातला. कर्जमाफीची रक्कम, बँकेतील मुद्दल आणि KYC नंतरची रक्कम यामध्ये फरक असल्याचा आरोप करत क्रांतीकारी शेतकरी संघटनेने शासन व बँक प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्या. OTS प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा CIBIL स्कोर खराब होऊन भविष्यात गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज व इतर बँक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होतील, अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली.
चिखली तालुक्यातील शेलसुर येथील स्टेट बँक शाखेत आज क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत, संतोष शेळके, अरुण नेमाने यांच्यासह शेकडो शेतकरी एकत्र आले. राज्य शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात बँकेची मुद्दल रक्कम, कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि KYC नंतरची रक्कम यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी शाखा व्यवस्थापकांना घेराव घालत तफावतीची संपूर्ण यादी जाहीर करावी, दोन लाखांच्या आतील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे CIBIL खराब होणार नाही याची लेखी हमी द्यावी, तसेच OTS किंवा हेअरकट पद्धतीने नव्हे तर शासनाने जाहीर केलेली संपूर्ण कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, तफावतीची रक्कम बँका OTS माध्यमातून भरत असल्यास संबंधित खात्यांवर त्याचा परिणाम होऊन CIBIL स्कोर खराब होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात शिक्षण कर्ज, गृहकर्ज, व्यवसाय कर्ज किंवा इतर बँक कर्ज मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता असून शेतकरी पुन्हा सावकारांच्या दारी जाण्याची वेळ येईल. क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तफावत दूर करावी, संबंधित शेतकऱ्यांचे CIBIL अबाधित राहील याबाबत स्पष्ट आदेश बँकांना द्यावेत आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व अडचणींची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, अशी मागणी केली. अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी रविंद्र अण्णा काळे, सतीश घाडगे, अंकुश घाडगे, नितीन चव्हाण, शिवशंकर घाडगे, पवन भाकरे, नेताजी कापसे, शिवाजी घाडगे, लक्ष्मण रिंढे, हरिदास नेमाने, कैलास घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



