संवेदना प्रतिष्ठाणतर्फे स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

बुलढाणा :
संवेदना प्रतिष्ठाणच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना बुलढाण्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
श्रद्धांजली कार्यक्रमात प्रतिष्ठानचे नंदूभाऊ खोडके, प्रा. लक्ष्मण कंकाळ, वसंत सरदार, कुमार क्षीरसागर, माणिकराव गवई, प्रशांत इंगळे, अशोक जाधव, राजाराम गवई, प्रभाकर गवई, कैलास मोरे, चंद्रकांत आराख यांच्यासह संवेदना प्रतिष्ठाणचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजितदादा पवार यांना आदरांजली वाहिली.
यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना नंदूभाऊ खोडके यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “या राज्यातील खऱ्या अर्थाने कामाचा माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे. आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत अजितदादांनी जात–धर्म न पाहता सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे कार्य केले. त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हळहळ व्यक्त करीत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “रोखठोक, स्पष्ट आणि निर्भीड मत मांडणारे असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे कठीण आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.”
या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या माध्यमातून संवेदना प्रतिष्ठाणच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय व प्रशासकीय कार्याला आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रम वातावरण अत्यंत शोकाकुल असून उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू तर मनात अजितदादांप्रती अपार आदरभाव दिसून येत होता.



