बुलढाणा
*जिल्हा परिषदेत ‘क्रीडा स्पर्धा’ की प्रशासकीय ठप्पपणा? दोन दिवसांपासून कक्ष अधिकारी–कर्मचारी गायब; ग्रामस्थांचे हाल…*
जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, गेल्या दोन दिवसांपासून विविध विभागांचे कक्ष अधिकारी व कर्मचारी कार्यालयातून अक्षरशः गायब असल्याचे चित्र आहे. स्पर्धांच्या नावाखाली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणाच मैदानावर उतरल्याने जिल्हाभरातून आलेल्या ग्रामस्थांना शासकीय कामांसाठी दिवसभर चकरा माराव्या लागत आहेत.
जिल्हा परिषद कार्यालयातील अनेक महत्त्वाचे विभाग अक्षरशः ओस पडले असून, दाखले, मंजुरी, प्रस्ताव, तक्रारी, अनुदानाशी संबंधित कामे ठप्प झाली आहेत. सकाळपासून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना “साहेब स्पर्धेत गेले आहेत”, “आज कोणी उपलब्ध नाही” अशी उत्तरे मिळत असल्याने संतापाची लाट उसळली आहे…..
क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे असले तरी त्यासाठी संपूर्ण प्रशासन ठप्प करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पर्यायी व्यवस्था न करता, कक्ष अधिकारी आणि कर्मचारी एकाच वेळी गैरहजर राहणे हे गंभीर प्रशासकीय दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे…..
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातून अनेक किलोमीटर अंतरावरून आलेले शेतकरी, महिला, वृद्ध नागरिकांना रिकाम्या कार्यालयांमुळे परत जावे लागत आहे. काही नागरिकांनी तर “स्पर्धा संपेपर्यंत काम होणारच नाही का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
या गंभीर प्रकाराकडे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात लक्ष देतील का? क्रीडा स्पर्धांच्या काळातही प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? की ग्रामस्थांचे हाल हे नेहमीप्रमाणे दुर्लक्षितच राहणार, असा प्रश्न आता जिल्हाभरातून उपस्थित होत आहे….



