बुलढाणा फ्लॅश
भोंदू अशोक खरात प्रकरणात IAS-IPS अधिकाऱ्यांचा सहभाग? भन्ते ज्ञानज्योती यांची तीव्र प्रतिक्रिया…
“कायद्याच्या चौकटीत अटक करून शिक्षा द्या”; प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनाही धरले जबाबदार..
भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्यातील काही आयएएस व आयपीएस अधिकारी अडकले असल्याचा गंभीर आरोप समोर येत असून, या प्रकरणामुळे प्रशासनातील जबाबदारीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी भोंदू बाबाच्या पायावर डोके ठेवून श्रद्धा व्यक्त केल्याची चर्चा असून, यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याची टीका होत आहे.
या पार्श्वभूमीवर बौद्ध भिक्कू भन्ते ज्ञानज्योती यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, कोणताही व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असला तरी कायद्यापेक्षा मोठा नाही. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी आणि न्यायालयात सादर करून कायद्याच्या चौकटीत शिक्षा द्यावी.
यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक मूल्यांचा उल्लेख करत, उच्च पदांवरील अधिकाऱ्यांनी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नमूद केले. अशा घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असून, सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
तसेच, या संपूर्ण प्रकरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारने याकडे दुर्लक्ष न करता कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या प्रकरणावर सरकार नेमकी कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…



