मुंबई
*इंधन तुटवड्याचा फटका; एअर इंडियाची ४०० आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द…*
*विमान तिकीट दर गगनाला; प्रवाशांचे हाल, एअर इंडियाचा मोठा निर्णय..*
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याचा आणि वाढत्या विमान इंधन दरांचा मोठा परिणाम आता हवाई सेवांवर दिसून येत आहे. देशातील प्रमुख विमान कंपनी एअर इंडियाने तब्बल ४०० आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परदेशात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फटका बसला असून विमान तिकीटांचे दरही गगनाला भिडले आहेत.
आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थिती, विमान इंधन पुरवठ्यात निर्माण झालेला तुटवडा आणि वाढते ऑपरेशनल खर्च यामुळे एअर इंडियाने काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून पुढील काही दिवसांत सुमारे ४०० उड्डाणे रद्द करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरू येथून दुबई, लंडन, सिंगापूर, कॅनडा आणि अमेरिकेकडे जाणाऱ्या अनेक उड्डाणांवर याचा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांना पर्यायी उड्डाणांचा शोध घ्यावा लागत आहे.
दरम्यान, विमान तिकीटांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील तिकीट दर दुप्पट झाल्याने सामान्य प्रवाशांचे आर्थिक गणित बिघडले आहे. प्रवासी संघटनांकडून सरकारने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
एअर इंडियाकडून प्रभावित प्रवाशांना परतावा किंवा पर्यायी उड्डाणांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, वाढते इंधन दर आणि जागतिक परिस्थितीमुळे हवाई सेवांवरील संकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



