*रोहन पैठणकर प्रकरणी पोलिसांचे अधिकार वापरणाऱ्या गुन्हेगारांवर मोका लावा !…… भीमसैनिकांनी उद्याचा खामगाव बंद शांततेत पार पाडावा !*…….
– भाई अशांत वानखेडे
——————————————–
दिनांक २३/७/२०२५ रोजी रात्री११-३०वाजता रोहन पैठणकर वय २१ वर्षे यास जातीयवादी समाजकंटकांनी चौकातून उचलून नेऊन अपहरण केले व त्यास खामगावच्या काँग्रेस मैदानावर अमानुष मारहाण केली व त्याचा धर्म विचारून त्याला विवस्त्र करत अमानुषपणे मारहाण केली .त्याचेवर गाय चोरीचा खोटा आळ घेतला त्याचे मारहाणीचे आरोपींनी व्हिडिओ काढून स्वतःच प्रसारण केले ही बाब सबंध महाराष्ट्रा च्या पुरोगामीत्वाला कलंकित करणारी आहे.सदर अमानवीय घटनेचा “समतेचे निळे वादळ” या संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. सदर घटनेच्या निषेधार्थ उद्या खामगाव बंदची हाक देण्यात आली आहे त्यास समतेची निळे वादळ या संघटनेचे समर्थन असून हा बंद शांततेत पार पाडावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी केले आहे.

आम्ही बौद्ध धर्मीय लोक अहिंसावादी असून गोहत्या व गोवंश हत्या या दोन्ही बाबी निषिध्द मानतो.
गोहत्या बंदी व गोवंश हत्या बंदी ही बाब पोलिसांच्या अखत्यारीतील असून अशा प्रकारच्या हत्या घडू नयेत. प्राण्यांची चोरी होऊ नये. याची संपूर्ण खबरदारी व जबाबदारी पोलीस प्रशासनाने स्वीकारलेली असताना काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक बिना अधिकाराने बेकायदेशीर रित्या आपल्या टोळ्या तयार करून कायदा हातात घेत आहेत. अशा टोळ्या बनवून निरपराध लोकांना त्यांची जात धर्म विचारून अमानुष मारहाण करीत आहेत. ही बाब राज्यामध्ये प्रचलित कायदा व सुव्यवस्थेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये असे प्रकार सर्रास घडत असतील तर ही घटना पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे.
रोहन पैठणकर या २१ वर्षीय तरुणाला त्याचा धर्म विचारून विवस्त्र करत झालेली अमानुष मारहाणीची घटना सर्वसामान्य नसून जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव यांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असताना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली अटक झालेली असताना तांत्रिक उणिवा ठेवून जामीन होण्यास परिस्थिती कशी निर्माण झाली हा चिंतेचा विषय आहे. पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली ही बाब वेगळी ! पण या संदर्भाने समाज भावना अत्यंत तीव्र असून पोलिसांच्या अधिकार वापरणाऱ्या गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी पोलीस खात्याने उदाहरणात्मक शिक्षा देऊन बेकायदेशीर घडणाऱ्या अशा गंभीर अपराधांना वेळीच पायबंद घालणे गरजेचे व आवश्यक आहे.
राज्यामध्ये प्रचलित कायद्यासाठी अमलबजावणी करणारे शासन आणि प्रशासन अस्तित्वात असताना जात धर्माच्या नावाखाली राज्याचे वातावरण दूषित करणाऱ्या गुन्हेगारांनी कायदा हातात घेऊन असे घृणीत प्रकार घडवून आणावेत ही बाब राज्याचे मुख्यमंत्री/गृहमंत्री व संपूर्ण पोलीस प्रशासन यांच्या कार्यक्षमतेवर बदनामीचा डाग लावणारी आहे. सबब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालून पोलिसांचे अधिकार वापरणाऱ्या या गुन्हेगार टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करावी जेणेकरून अशा प्रकारचा गुन्हा महाराष्ट्रात पुन्हा कोणी करणार नाही याची काळजी महाराष्ट्राच्या राज्य शासनाने घ्यावी अन्यथा सबंध महाराष्ट्रभर आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे.



