बुलढाणा
*आदर्श जीवनासाठी परिसरातील कर्तृत्ववान व्यक्ती प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. गजानन जाधव…*

जीवनात यशस्वी होण्यासाठी आदर्शही तितकाच आदर्श असला पाहिजे. जगात दूरवर आदर्श शोधण्यापेक्षा आपल्या आसपासच्या कर्तृत्ववान व्यक्तींना आदर्श मानल्यास त्यांच्या दैनंदिन जीवनातील पारदर्शकता, नीतिमत्ता आणि मूल्यांची जाणीव होते. अशा आदर्शातूनच नैतिकतेने जगण्याचे बळ मिळते, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्था, मोताळा येथील प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी केले.
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन २३ जानेवारी रोजी दुपारी संस्थेच्या भाऊसाहेब देशमुख सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना डॉ. जाधव यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याचा संदर्भ देताना सांगितले की, आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होऊनही ब्रिटिशांच्या गुलामगिरीची नोकरी नाकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अपमानाची हीच शिदोरी त्यांच्या उरात साठवून त्यांनी देशासाठी संघर्ष केला आणि म्हणूनच ते महानायक ठरले, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास बोराखेडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार महात्रे, कृषी अधीक्षक देशमुख, प्रबोधनकार अॅड. सतीशचंद्र रोठे पाटील, आझाद हिंद संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, प्रा. कॅप्टन मेहेरकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
*आत्मविश्वासाच्या बळावर प्रत्येक शिखर गाठता येते – अॅड. सतीशचंद्र रोठे पाटील…*
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रबोधनकार अॅड. सतीशचंद्र रोठे पाटील म्हणाले की, आत्मविश्वासाच्या बळावर जगातील कोणतेही शिखर सहज गाठता येते. मात्र आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी वर्तमान परिस्थितीमध्ये जगण्याची जाणीव असणे गरजेचे आहे. परिस्थितीचे भान ठेवून प्रयत्न केल्यासच यशाच्या शिखरावर पोहोचता येते. विविध सामाजिक आणि वैज्ञानिक उदाहरणे देत त्यांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चाटे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. चित्रा मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मास्कर मॅडम, प्रा. डॉ. अरुण गवारे, प्रा. निलेश ढगे, दिनेश ढगे, प्रा. दादा मनगटे, प्रा. निलेश रहाटे, प्रा. डॉ. ठेंग, प्रा. डॉ. गवारे यांच्यासह श्री शिवाजी महाविद्यालय मोताळाचे कर्मचारीवृंद आणि आझाद हिंद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.



