“बुलढाणा ‘जिजाऊ नगर’ करा, करवंड येथे ऐतिहासिक स्मारक उभारा” – अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजुभाऊ गायकवाड आक्रमक
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी विविध विकासकामे, सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचे “जिजाऊ नगर” असे नामकरण करण्याची ठाम मागणी करत इतिहास जपण्यावर भर दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी म्हणून ओळख असलेल्या चिखली तालुक्यातील करवंड गावात भव्य ऐतिहासिक स्मारक उभारण्याची मागणीही त्यांनी केली.
सिंचनाच्या प्रश्नावर बोलताना, मतदारसंघात उभारलेल्या ५७ बंधाऱ्यांमुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आणखी किमान ७५ बंधारे व नवीन धरणे उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. विशेषतः मोताळा तालुक्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या वापरामुळे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत त्यांनी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली. तसेच अल्पवयीन मुलींच्या निर्णयक्षमतेबाबत अभ्यास करून योग्य उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांच्या हितासाठी दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नवीन मंडळांना पोलीस परवानगी मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून नियम सुलभ करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
आरोग्य सुविधांबाबतही त्यांनी आवाज उठवत अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करणे, एमआरआय मशीन सुरू करणे याकडे शासनाने लक्ष द्यावे, असे स्पष्ट केले. ग्रामीण भागातील वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस गस्त व नाकाबंदी कडक करण्याची गरजही त्यांनी मांडली.
एकूणच, शेतकरी, युवक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी प्रभावीपणे मांडणी करत बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस मागण्या केल्या.



