बुलढाणा
*“संगीत हे भावना व्यक्त करण्याचे सशक्त माध्यम” – मालती शेळके; स्वरविहारचा ‘सांज पाडवा’ सोहळा उत्साहात संपन्न…”*

संगीत हे मानवी जीवनातील भावभावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम असून प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन मालती शेळके यांनी केले. त्या स्थानिक शारदा ज्ञानपीठाच्या खुल्या रंगमंचावर २२ मार्च २०२६ रोजी स्वरविहार संगीत विद्यालयाच्या ‘सांज पाडवा’ निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
या कार्यक्रमात हिंदी व मराठी गीतांचा बहारदार संगम सादर करण्यात आला. पुढे बोलताना शेळके यांनी संगीतामुळे मानसिक आनंद मिळतो, त्यामुळे प्रत्येकाने संगीत कलेचे शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच स्वरविहार संगीत विद्यालयातून भविष्यात दर्जेदार कलाकार घडतील आणि ते रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी ज्येष्ठ संगीत तज्ञ अरविंद टाकळकर, सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गजेंद्र निकम, लताताई गुर्जर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्वरविहार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण करत प्रेक्षकांची मनं जिंकली. कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून अमोल दिशागज व प्रकाश खरे यांनी वाद्यसंगत दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे संचालक रविकिरण मोरे यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली मोरे यांनी तर आभार प्रदर्शन आदित्य गोफणे यांनी केले.
या सांस्कृतिक सोहळ्यास सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



