बुलढाणा
बुलढाण्यात भर रस्त्यावर भाजी मार्केट; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त…
जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या बुलढाणा शहरात भर रस्त्यावरच भाजीपाला बाजार भरत असल्याने वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका वाढला आहे. नगरपालिकेने स्वतंत्र बाजारपेठ बांधून दिली असतानाही मलकापूर-चिखली रोडवरील जयस्तंभ चौक परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व इतर विक्रेत्यांचा बाजार भरविला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रविवारी या परिसरात वाहनांची मोठी गर्दी होत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे. वाढत्या गर्दीमुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासन व नगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नगरपालिकेचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याऐवजी विक्रेत्यांकडून वसुलीत व्यस्त असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.
शहरातील वाहतूक समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मोकळ्या जागेत नियोजित बाजारपेठ भरवावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.



