दिल्ली ( जंतर मंतर )
*जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सुषमा अंधारे व जयश्री शेळके यांची भेट; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा जाहीर पाठिंबा*
*NEET पेपर घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; सोनम वांगचुक यांच्या लढ्याला उबाठा शिवसेनेचा ताकदीचा पाठिंबा*
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते तसेच शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी जंतर-मंतर येथे आंदोलनस्थळी जाऊन सोनम वांगचुक यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत देशातील युवकांच्या भविष्यासाठी सुरू असलेल्या या लढ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष खंबीरपणे सोबत असल्याचे स्पष्ट केले. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी हा संघर्ष अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
सुषमा अंधारे यांनी यावेळी NEET पेपर घोटाळ्याचा उल्लेख करत, देशातील सर्वात मोठ्या परीक्षा घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सरकार या प्रकरणात ठोस भूमिका घेत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशभरातून सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक सामाजिक संघटना, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध राजकीय पक्षांकडून पाठिंबा व्यक्त केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काही अपवाद वगळता मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून या आंदोलनाला अपेक्षित प्रसिद्धी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित व्हावी, या उद्देशाने सुरू असलेल्या या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व शिवसैनिक ताकदीने सहभागी राहतील आणि आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देतील, अशी भूमिका सुषमा अंधारे आणि जयश्री शेळके यांनी यावेळी स्पष्ट केली.
देशातील युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी हा लढा निर्णायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



