नवी दिल्ली/ बुलढाणा
*विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक लढ्याचा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, जंतर-मंतरवर जल्लोष…*
*आमदार सिद्धार्थ खरात यांनी जंतर-मंतरवर दिला विद्यार्थ्यांना पाठिंबा; “हा युवाशक्तीच्या संघर्षाचा विजय”…*
देशभरातील विद्यार्थ्यांनी न्यायासाठी उभारलेल्या अभूतपूर्व आंदोलनाने अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी (२५ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली. ही माहिती मिळताच आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
याच ऐतिहासिक क्षणी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी जंतर-मंतर आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व करणारे अभिजीत दिपके, आशुतोष राणा आणि सौरभ दास यांची भेट घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. “मेहकर विधानसभा मतदारसंघातील जनता विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या संघर्षात खंबीरपणे उभी आहे,” असा विश्वास त्यांनी आंदोलकांना दिला.
विशेष म्हणजे, आमदार सिद्धार्थ खरात आंदोलनस्थळी पोहोचल्याच्या काही क्षणांतच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची बातमी तेथे पोहोचली. ही बातमी समजताच विद्यार्थ्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. अनेक दिवसांपासून आंदोलनाची धुरा सांभाळणारे अभिजीत दिपके यांच्या चेहऱ्यावर या यशाचा आनंद स्पष्ट दिसून येत होता. त्यांनी हा विजय देशातील प्रत्येक विद्यार्थी, युवक आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा असल्याचे सांगत सहकाऱ्यांसोबत आनंद व्यक्त केला.
आंदोलनस्थळी उपस्थितांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटल्या. “मेहकरच्या आमदारांचे पायगुण चांगले ठरले… खरातांनी जंतर-मंतरवर पाऊल ठेवताच मोठी विकेट पडली,” अशा चर्चाही रंगल्या. त्यामुळे आमदार खरात यांच्या भेटीची राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली.
विद्यार्थ्यांच्या मते, हा राजीनामा केवळ एका मंत्र्याच्या पदत्यागापुरता मर्यादित नसून, देशभरातील विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, लोकशाही मार्गाने लढलेल्या संघर्षाचा आणि युवाशक्तीच्या निर्धाराचा ऐतिहासिक विजय आहे. मात्र, आंदोलनातील उर्वरित मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी यावेळी पुन्हा स्पष्ट केली.



