बुलढाणा ब्रेकिंग
*राज्यात १३ वर्षांची मुलगीही सुरक्षित नाही; वडगाव पान अॅसिड हल्ल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह – जयश्री शेळके यांचा सरकारवर घणाघात…*
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे १३ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री मुनील शेळके यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे.
जयश्री शेळके यांनी म्हटले आहे की, “राज्यात १३ वर्षांची मुलगीही सुरक्षित नाही, ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. वडगाव पान येथील अॅसिड हल्ल्याने राज्यातील महिला सुरक्षेची वस्तुस्थिती उघड झाली आहे.” त्यांनी पुढे आरोप केला की, राज्यात दररोज सुमारे २० महिलांवर अत्याचार होत असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे…
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिला व पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. कायदा आणि सुव्यवस्था केवळ नावालाच उरली असून, राज्य सरकार शेवटच्या घटका मोजत असल्याची टीकाही त्यांनी केली….
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. तसेच, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



